Tuesday 26 February 2019

कमळगड किल्ला

कमळगड किल्ला Kamalgad Fort – ४२०० फूट उंचीचा हा किल्ला गिरीदुर्ग प्रकारातील आहे.
सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर डोंगररांगेतील हा किल्ला ट्रेकर्स च्या दृष्टीने मध्यम समजला जातो.

महाबळेश्वराच्या डोंगररांगनी अनेक ऐतिहासिक गड अलंकारासारखे धारण केले आहेत. धोम धारणाच्या जलाशयात मागील बाजूने एक डोंगररांग पुढे आलेली दिसते. दोन्ही अंगानी पाण्याचा वेढा असलेल्या या पर्वतराजीत हे एक अनोखे पाषाणपुष्प वर आले आहे. दक्षिणेकडे कृष्णानदीचे खोरे आणि उत्तरेकडे वाळकी नदीचे खोरे यांच्या मधोमध हा दिमाखदार किल्ला उभा आहे.

गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे : पंधरा वीस मिनिटांच्या भ्रमंती नंतर गडाच्या निकट आपण पोहचतो. वर जाताच गडमाथ्याच्या सपाटीवर प्रवेश होतो आणि आजुबाजूचा डोंगरदऱ्यांचा सुंदर मुलूख आपल्या दृष्टीपथात येतो. एरवी आढळणारे किल्ल्यांवरील प्रवेशद्वार, बुरूज असे काहीच येथे आढळत नाहीत. गडाला जोडून येणारी एक डोंगर रांग लक्ष वेधून घेते. तिला नवरानवरी चे डोंगर म्हणतात. पुढे जमीन खोल चिरत गेलेले ४०-५० फूटलांबीचे एक रुंद भुयार दिसते. त्याला आत उतरायला मजबूत पायऱ्याही आहेत. हीच ती गेरूची किंवा कावेची विहीर, उंच अशा या ५०-५५ पायऱ्या उतरत जाताना आपण डोंगराच्या पोटात जात असल्यासारखे भासते. हवेतील थंडावाही वाढत जातो. तळाशी पोहचल्यावर चहुबाजूला खोल कपारी असून सर्वत्र गेरू किंवा कीव याची ओलसर लाल रंगाची माती दिसते गडावर दक्षिणेकडे कातळाची नैसर्गिक भिंत तयार झाली आहे. तिच्यावर बुरुजाचे थोडेफार बांधकाम झाले आहे. गडावर कोठेही पाण्याचे टाके नाही. दक्षिणेकडेच गवतात लपलेले चौथऱ्यांचे अवशेष दिसतात. नैऋत्येला केंजळगड, त्याच्या मागे रायरेश्वराचे पठार व पश्चिमेकडे पाचगणी, पूर्वेला धोम धरण अशी रम्य सोयरिक कमळगडाला मिळाली आहे. धोमचे हेमाडपंती शिवमंदिर प्रेक्षणीय आहे. मूळ मंदिर धोम ऋषींच्या वास्तव्याने प्रसिद्ध झाले. थोर संत कवी वामन पंडित यांचीही जवळच भोमगावाला समाधी आहे.

गडावर जाण्याच्या वाटा :कमलगडावर जाण्याचे अनेक मार्ग आहेत. ते सर्वच ट्रेकिंगचा मनमुराद आनंद देणारे आहेत.

१. महाबळेश्वरहून : महाबळेश्वरच्या केट्स पॉईंट वरून खाली येणाऱ्या सोंडेवरून कृष्णा नदीच्या खोऱ्यात उतरले की सुमारे दोन तासांत समोरच्या डोंगर उतारावरील नांदवणे गावी पोहचतो. वस्तीच्या पाठीवरील पहाडावरून तसेच वर गेले की दोन अडीच तासांत कमळगडावर पोहचता येते.

२. वाईहून : वाईहून नांदवणे गावी येण्यास सकाळी ९:३० वाजता एस.टी. बस आहे.

३. उत्तरेकडून : वाळकी नदीच्या खोऱ्यातील असरे, रानोला वासोळे गावीही वाईहून एस.टी. ने येता येते. वासळ्याहून येताना धोम गावापासून सुरू झालेला धोम धरणाचा जलाशय थेट गावापर्यंत साथ देतो. वासोळे गावातून पाणवठ्याच्या दिशेने चढणीस सुरुवात केली असता. आपण साधारण एक ते दीड तासातच माचीजवळ येतो. वासोळे गाव हे डोंगराच्या कुशीत वसलेले निसर्ग सौंदर्याने नटलेले असे सुंदर खेडे आहे. वस्तिच्या पाठीवर उत्तुंग कडा व डोंगरमाथा आहे, दुसऱ्या अंगाला खोलदरी आहे. पुढे गेल्यावर यू टर्न घेऊन पाऊण तासानंतर आपण किल्ल्याच्या मुख्य पहाडावर येतो. डोंगरमाथ्यावरील घनदाट वृक्षांच्या छायेत गोरखनाथ मंदिर दिसते. येथून थोडे पुढे ५-१० मिनिटे चालत गेल्यावर रस्त्याच्या डाव्याबाजूला एक पाण्याचे टाके लागते. पाऊल वाटेने तसेच वर गेले की १५-२० मिनिटांचा घनदाट जंगलाचा छोटा टप्पा लागतो. नंतर मात्र आपण मोकळ्या मैदानावर येतो. येथे धनगरांची वस्ती आहे. याच पठारावरून आपणास कमळगड पूर्णप्णे दृष्टीपथात येतो. वस्तीपासून उजवीकडे गडावर जाण्यची वाट आहे.

गडावर रहाण्याची सोय नाही. माचीवरील गोरखनाथ मंदिरात पाच-सहा राहू शकतात. गडावर जेवणाची सोय नाही. गडावर पाण्याची सोय नाही. गोरकनाथ मंदिराच्या थोडे पुढे छोटे टाके आहे. गडावर जाण्यासाठी नांदवणे मार्गे अडीच तास लागतात.

#कमळगड #किल्ला #Kamalgad #KamalgadFort

चंदन–वंदन किल्ला

चंदन–वंदन किल्ला Chandan-Vandan Fort – ३८०० फुट उंचीचा हा किल्ला गिरीदुर्ग प्रकारातील आहे.
सातारा जिल्ह्यातील सातारा डोंगररांगेतील हा किल्ला ट्रेकर्स च्या दृष्टीने सोपा समजला जातो.

कथा आणि कांदबरी मध्ये जुळ्या भावा विषयी नेहमीच ऐकत असतो मात्र दुर्गविश्वातही अशी जुळी भांवडे आढळतात. त्यांच्यापैकीच एक चंद्न-वंद्न साताऱ्याच्या अलीकडे २४ कि.मी. अंतरावर ही दुर्गजोडी उभी आहे. ऊसाच्या पिकामुळे सधन झालेला हा सर्व परिसर त्यामुळे रस्ते, वीज, एस.टी. या सर्व प्राथमिक सुविधा गावा गावा पर्यंत पोहोचल्या आहेत. सपाट माथा असल्यामुळे पुणे-सातारा मार्गावरून हे किल्ले सहजच ओळखता येतात. यांचा पूर्वेस जरंडेश्वर कल्याणगड, भवानीचा डोंगर, पश्चिमेस वैराट्गड, पांडवगड. एकीकडे महाबळेस्वर प्रांत तर दुसरीकडे सातारा शहर यांच्या सीमेवर हे किल्ले उभे आहेत.

इतिहास : इ.स. ११९१-११९२ सालच्या ताम्रलेखानुसार हे किल्ले शिलाहार राजा दुसरा भोज याने बांधले. १६७३ च्या सुमारास शिवरायांनी सातारा प्रांत जिंकला आणि त्याचवेळी सज्जनगड, कल्याणगड, अजिंक्यतारा या किल्ल्यांसओबत यांना देखील स्वराज्याट सामील करून घेतले. पुढे संभाजी राजांच्या कारकिर्दीत सन १६८५ मधे फेब्रुवारी महिन्यात अमानुल्ला खानाने चंदन-वंदन येथे असणाऱ्या मराठ्यांच्या तुकडीवर हल्ला केला. या चकमकीत मोघलांच्या हातात २५ घोडी, २० बंदुका , २ निशाणे, १ नगारा सापडला. पुढे १६८९ पर्यंत हा सर्व परिसर मराठ्यांच्या ताब्यात होता. नंतर मात्र तो मोगलांच्या हातात पडला. छत्रपती शाहुमराहाराजांनी स्न १७०७ मध्ये पावसाळ्यात हा प्रदेश जिंकून घेतला. पुढे सन १७५२ मध्ये ताराबाईवर लक्ष ठेवण्यास पुरेसा फौजफाटा देऊन बाळाजी विश्वनाथांनी या किल्ल्यावर दादोपंत यांची नेमणूक केली. नंतर हा किल्ला इंग्रजांच्या हातात पडला.

गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे : चंदनच्या प्रवेशद्वाराजवळील रस्ता पूर्वी बराच कठिण होता. मात्र सध्या तेथे असलेल्या मशिदीमुळे हा रस्ता बराच रुंद झाला आहे. दोन अर्धवट पडलेले बुरुज आपणास प्रवेशाद्वाराची जाणीव करून देतात. येथून साधारण १५ पायऱ्या पार गेले असता डाव्या बाजूस एक पडकी वास्तू दिसते. तिच्या वरच्या अंगास एक वडाचे झाड आहे. पाच वडांचा मिळून बनलेला असल्यामुळे त्यास ‘पाचवड” म्हणतात. बाजूलाच एक शंकराचे मंदिर आहे. यातील दोन्ही महादेवाच्या पिंडी या पाच लिंगांच्या आहेत. ग्रामस्थांनी मंदिराचा जीर्णोद्धार केला आहे. श्रावणात येथे यात्रा असते. ( येथून दहा एक पायऱ्या चढून गेल्यावर समोरच मोठ्या मोठ्या शिळा रचलेल्या दिसतात.) वंदनप्रमाणेच येथेही एक दर्गा आहे. दर्ग्याच्या बाजूस एखाद्या वाड्याच्या भिंतीसारखे आंधकाम आढळते. एका अर्धवट दरवाजासारखे काहीतरी दिसते. साधारण सदरेसारखे येथील बांधकामाचे अवशेष दिसतात. याच्या मागील भागात सुद्धा अनेक उद्ध्वस्त अवशेष आपणास दिसतात. हीच गडावरील मुख्य वस्ती असावी. गडाच्या उत्तर टोकावर मजबूत बांधणीचा अगदी सुस्थितीत असलेला एक बुरूज आढळतो. याच वाटेवर एक समाधी आढळते. याच्या वरील बाजूस अस्पष्ट असे शिवलिंग आहे आणि एका बाजूस आरुतीची मूर्ती आहे. गडाच्या दक्षिणेकडे तीन कोठ्या असलेली पण वरचे छप्पर उडालेली वास्तू आढळते. गावकऱ्यांच्या मते हेकोठार म्हणजे दारूगोळा साठवण्याची जागा होती. गडाच्या मध्यभागी प्रशस्त चौथरा आहे. यावर काय वास्तू होती याचा मात्र अंदाज लागत नाही.

गडावर जाण्याच्या वाटा : चंदन आणि वंदन या दोन्ही किल्ल्यावर जाणाऱ्या सयुंक्त वाटा आहेत. पुणे-सातारा मार्गावर भुईंज गाव आहे. तेथे उतरून २० कि.मी. अंतरावर किकली गाव आहे. वाई-सातारा या दोन्ही ठिकाणाहून किकलीला येण्यासाठी बस आहे. किकलीच्या जवळच बेलमाची नावाचे गाव आहे. या बेलमाची गावाचे दोन भाग आहेत. एक आहे ती खालची बेलमाची तर दुसरी वरची बेलमाची. येथूनच एक वाट चंदन आणि वंदन यांच्या खिंडीत पोहोचते. डावीकडे राहतो तो चंदन तर उजवीकडे वंदन. या चंदन किल्ल्यावर जाण्यासाठी दोन वाटा आहेत.

दर्गात रहायचे असल्यास ३०-४० जणांना राहता येते. जेवणाची सोय नाही. फक्त पावसाळ्यात पाण्याची सोय होते अन्यथा गडावर पाणी नाही. गडावर जाण्यासाठी अडीच ते ३ तास लागतात.

#चंदन–वंदन #किल्ला #ChandanvandanKilla #ChandanvandanFort

साल्हेर किल्ला

साल्हेर किल्ला Salher Fort – १५६७ मी. उंचीचा हा किल्ला गिरीदुर्ग प्रकारातील आहे.
नाशिक जिल्ह्यातील सेलबारी-डोलबारी डोंगररांगेतील हा किल्ला ट्रेकर्स च्या दृष्टीने सोपा समजला जातो.

महाराष्ट्रात जसा सर्वात उंच शिखराचा मान कळसूबाईचा, तसा गडकिल्ल्यांमध्ये सर्वाधिक उंचीचा मान साल्हेरचा. बागलाण हा मोक्षगंगा आणि अक्षगंगा या नद्यांमुळं समृद्ध झालेला प्रदेश. येथील भूमी तशी सुपिकच त्यामुळे येथील लोकांचे रहाणीमान तसे थोडे उंचावलेले. तरीही डोंगरी भागात कोकण, भिल्ल सारख्या काही आदीवासी जमाती रहातात. साल्हेर गडाचा घेरा साधारणपणे ११ कि.मी. असून व्यापलेले क्षेत्र ६०० हेक्टर आहे.

इतिहास : साल्हेर गड हा परशुरामाची तपोभूमी म्हणून प्रसिद्ध आहे. जिंकलेल्या पृथ्वीचे दान करून स्वतःसाठी भूमी मिळवण्यासाठी सागराला मागे हटवायला त्यांनी बाण सोडला तो याच भूमीवरून असे पौराणीक स्थान असलेल्या साल्हेरचे शिवकालीन इतिहासातील स्थान देखील महत्त्वाचे आहे. ते येथे झालेल्या प्रसिद्ध लढाईमुळे. शिवरायांनी १६७१ मध्ये बागलाण मोहिम काढली आणि साल्हेर जिंकून घेतला. त्या मोहिमेची वार्ता दिल्लीच्या पातशहाला मिळाली. ते ऐकून पातशहा कष्टी झाला. नि म्हणाला,‘काय इलाज करावा, लाख लाख घोड्याचे सुभे रवाना केले ते बुडवले नामोहरम होऊन आले. आता कोण पाठवावे’ तेव्हा पातशहाने ‘शिवाजी जोवर जिंवत तोवर दिल्ली आपण सोडीत नाही’ असा विचार केला आणि इखलासखान व बहोलोलखान यांस बोलावून वीस हजार स्वारांनिशी सालेरीस रवाना केले. मग इखलासखानाने येऊन साल्हेरला वेढा घातला. हे वर्तमान जेव्हा राजांना कळले तेव्हा मोगलाईत पाठवलेले आपले सरनौबत प्रतापरावांना जासूदाकरवी कळविले ‘तुम्ही लष्कर घेऊन सालेरीस जाऊन बलोलखानास धारून चालवीणे आण कोकणातून मोरोपंत पेशव्यांनाही हशमानिशी रवाना केले. ’ हे इकडून येतील तुम्हीही वरघाटी कोकणातून येणे असे दुतर्फा चालून येऊन गनिमास गर्दीस मिळवणे’. अशी पत्रे पाठविली. त्याप्रमाणे एकीकडून प्रतापराव तर दुसरीकडून पेशवे, उभयता सालेरीस आले, आणि मोठे युद्ध झाले. सभासद बखरीत याचा उल्लेख खालीलप्रमाणे आढळतो. “चार प्रहर दिवस युद्ध जाहले मोगल, पठाण, रजपूत, तोफांचे, हत्ती, उंट आराबा घालून युद्ध जाहले. युद्ध होताच पृथ्वीचा धुराळा असा उडाला की, तीन कोश औरस चौरस, आपले व परके लोक माणूस दिसत नव्हते. हत्ती रणास आले दुतर्फा दहा हजार माणूस मुर्दा जाहले पूर वहिले. रक्ताचे चिखल जाहले. त्यामध्ये रुतो लाबले, असा कर्दम जाहला.

मराठ्यांनी इखलासकान आणि बेलोलखानाचा पाडाव केला. युद्धात प्रचंड प्रमाणावर हानी झाली. या युद्धात शिवरायांच्या एक लाख २० हजार सैन्याचा समावेश होता, पैकी १० हजार माणसे कामीस आले. सहा हजार घोड, सहा हजार उंट, सव्वाशे हत्ती तसेच खजिना, जडजवाहीर, कापड अशी अफाट मालमत्ता शिवरायांच्या हाती आली. या युद्धात मावळ्यांनी पराक्रमाची शर्थ केली. मोरोपंत पेशवे आणि प्रतापरव सरनौबत यांनी आणीबाणी केली. सूर्यराव काकडे यांना पराक्रम गाजवतांना आपला देह ठेवावा लागला. ते तोफेचा गोळा लागून पडले. ‘सूर्यराव काही सामान्य योद्धा नव्हे. भारती जैसा कर्ण योद्धा त्याचा प्रतिमेचा, असा शूर पडला.’ विजयाची बातमी शिवरायांकडे गेली राजे खूप खूश झाले. खबर घेऊन आलेल्या जासूदांना सोन्याची कडी आणि प्रतापराव सरनौबत, मोरोपंत पेशवे, आनंदराव, व्यंकोजी पंत यांना अपार बक्षीस आणि द्राव्य देण्यात आले. हा पराभव दिल्लीच्या बादशहाच्या जिव्हारी लागला की सभासद म्हणतो- पातशहा असे कष्टी जाले. ‘खुदाने मुसलमानांची पातशाही दूर करून शिवाजीसच दिधली असे वाटते. आता समोरासमोर लढाई करून तोपर्यंत महाराजांना विजय प्राप्त झाला होता, त्यात साल्हेरचा विजय प्रथम मानावर होता. असा मोठा विजय यापूर्वी कधीही मिळाला नव्हता. या युद्धात महाराजांच्या लोकांनी दाखवलेल्या युद्धकौशल्याची व शौर्याची किर्ती चहुकडे पसरली आणि त्यांचा दरारा अधिकच वाढला. साल्हेर जिंकल्यानंतर त्यासमोरील मुल्हेर किल्ला मराठ्यांनी जिंकला आणि संपूर्ण बागलाण प्रांतावर त्यांनी आपला शह बसवला. त्यामुळे सुरत शहरास कायमची दहशत बसली.

गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे :वाघंबे मार्गेगडावर आल्यास उजवीकडे आणि साल्हेरवाडीतून गडावर आल्याश डावीकडे वळल्यास पाच ते दहा मिनिटाच्या अंतरावर काही भग्न पावलेल्या मंदिराचे अवशेष आढळतात. पुढे थोड्याच अंतरावर पाण्याची दोन टाकी असून समोर गंगासागर तलाव दृष्टीस पडतो. तलावाच्या बाजूलाच रेणुका मातेचे आणि गणेशाचे छप्पर नसलेले मंदिर आहे. या मंदिराच्या जवळून दोन वाटा फुटतात. उजवीकडे जाणारी वाट सरळ एका पाण्याच्या टाक्यापाशी घेऊन जाते. टाक्यांसमोरच एक यज्ञवेदी आहे. जवळच एक मूर्तीदेखील आहे. मंदिरापासून वर चढत जाणारी वाट आपल्याला तीन गुहांपाशी घेऊन जाते. गुहांच्या समोर मारूतीचे मंदिर आहे. या गुहांमध्ये रहाता येऊ शकते. गुहांशेजारची वर जाणारी वाट गडाच्या अत्युच्च शिखरावर घेऊन जाते. या शिखरावर श्री परशुरामाचे मंदिर आहे. या उंच गडामाथ्यावर काहीशा ढासळलेल्या अवस्थेत असलेल्या या मंदिरात परशुरामांची मूर्ती व पादुका आहेत, आणि जोडीला भान हरपून टाकणारा निसर्ग. येथून आजूबाजूच्या प्रदेशाचे विहंगम दृश्य नजरेस पडते. येथून संपूर्ण बागलाण विभाग दिसतो. हा गड डांग-गुजरात आणि बागलाण यांना जोडणाऱ्या व्यापारी वाटेवर असल्याने संरक्षण दृष्ट्या महत्वाचा होता. समोर दक्षिण बाजूला अजंठा-सातमाळा डोंगरातले धोडप इखारीया हे सुळके दिसतात. पूर्वेकडे मांगी-तुंगी, तांबोळ्या, न्हावीगड, हनुमान टेकडी, मुल्हेरगड, हरगड, मोरागड आणि सालोटा नजरेस पडतात. समोरच हरणबारीचे धरण लक्ष वेधून घेते.

गडावर जाण्याच्या वाटा : गडावर जाण्यासाठी प्रमुख दोन वाटा आहेत.

वाघांबे मार्गे : साल्हेरला जाण्यासाठी नाशिक-सटाणामार्गे ताहराबाद गाठावे. गुजरातमधून यायचे झाल्यास डांग जिल्ह्यातून ताहराबादला जाण्यास रस्ता आहे. ताहराबादहून मुल्हेरमार्गे वाघंब अशी एस.टी. अथवा जीप सेवा देखील उपलब्ध आहे. वाघंबे गाठल्यावा गावातूनच साल्हेर-सालोटा यांच्या खिंडीतून साल्हेरला जाणारी वाट आहे. वाटेत कुठेही पाणी नसून खिंडीपर्यंत चालणारी वाटचाल दमछाक करणारी आहे. या वाटेने गडावर जाण्यासाठी साधारण अडीच तास लागतात.या वाटेने गडावर जातांना चार दरवाजे लागतात. तिसऱ्या ते चौथ्या दरवाजाच्या दरम्यान कड्यात खोदलेल्या १८ ते२० गुहा आहेत. चौथ्या दरवाजाच्या कमानीवर एक शिलालेख आढळतो. येथून आत आल्यावर समोरच एक पठार दिसते.

साल्हेरवाडी मार्गे : साल्हेरवाडी हे गाव वाघंबे गावाच्या पुढे आहे. साल्हेरवाडीला दोन मार्गांनी जाता येते. एक सटाणा-ताहराबाद-मुल्हर-साल्हेरवाडी असा आहे. साल्हेरवाडीहून गडावर जाणारी वाट दमछाक करणारी आहे. या वाटेने सहा दरवाजे पार करून सुमारे तीन तासांनी आपण गडावर पोहचतो. वाट मळलेली असल्याने चूकण्याची शक्यता नाही. या वाटे कुठेही पाणी नाही.

माळदर मार्गे : गडावर जाण्यासाठी असलेली ही वाट फारशी वापरत नाही. ही वाट माळदर गावातूनच जाते. सटाण्याहून एस.टी.ने माळदरला जाता येते. ही वाट साल्हेर व सालोटा यांच्या दरम्यानच्या खिंडीमधुन जाते. या वाटेने गडावर जायला साधारण तीन तास लागतात.

राहण्याची सोय गडावर असलेल्या तीन गुहांमध्ये रहाण्याची व्यवस्थित होऊ शकते. जेवणाची सोय आपण स्वतःच करावी. गंगासागर तलाव व त्याच्या बाजूला असणारी दोन पाण्याची टाकी यातील पाणी पिण्यास योग्य आहे. गडावर जाण्यासाठी वाघांबे मार्गे अडीच तास, साल्हेरवाडी मार्गे तीन तास, माळदर मार्गे तीन तास लागतात.

#साल्हेर #किल्ला #Salher

वारुगड किल्ला

वारुगड किल्ला Varugad Fort – ३००० फूट उंचीचा हा किल्ला गिरीदुर्ग प्रकारातील आहे.
सातारा जिल्ह्यातील सातारा – फलटण डोंगररांगेतील हा किल्ला ट्रेकर्स च्या दृष्टीने सोपा समजला जातो.

माणागंगा नदी जिथे उगम पावते त्या सीताबाईच्या डोंगरात डाव्या कुशीवर एक किल्ला आहे त्याचे नाव आहे वारुगड. किल्ला माण तालुक्यात दहिवडीच्या ईशान्येस २० मैलांवर आहे.

इतिहास : किल्ला शिवरायांनी बांधला असे सांगतात. या किल्ल्याचा किल्लेदार परभूजातीचा होता. २०० पहारेंकरी व बरीच शिबंदी किल्ल्यावर होती. १८१८ मध्ये साताराच्या राजाच्या फडणीस विठ्ठलपंत याने २०० लोक पाठवून दुसऱ्या बाजीरावपासून घेतला.

गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे : किल्ला हा दोन भागात मोडतो. एक गडाची माची तर दुसरा बालेकिल्ला.

१. वारुगड माची : किल्ल्याच्या माचीवर गेल्यावर समजते की गडाचा घेरा केवढा मोठा आहे. किल्ल्याची माची ही संपूर्ण तटबंदी वेष्टीत आहे. आजही ती बऱ्याच मोठ्या प्रमाणावर शाबूत आहे. बालेकिल्ल्यावर जाणारा मार्ग हा या माचीतून पुढे जातो. या माचीत शिरण्यासाठी पूर्वी ५ दरवाजे होते. मात्र सद्य स्थितिला दोनच शिल्लक आहे. गिरवी जाधववाडी या मार्गेमाचीत प्रवेश करणारी वाट एका दरवाजातून वर येते. तर मोंगळ-घोडेवाडी माचीत प्रवेश करणारी वाट दुसऱ्या दरवाजातून वर येते. माचीवर घरांचे, वाड्यांचे अनेक अवशेष आहेत. दोन ते तीन पाण्याचीटाकी, तळी सुद्धा आहेत. मचीवर भैरोबाचे जीर्णोद्धारीत मंदिर सुद्धा आहे. मंदिर प्रशस्त असल्याने येथे राहण्याची सोय होऊ शकते. संपूर्ण माची फिरण्यास दोन तास लागतात.

२. बालेकिल्ला : गिरवी जाधववाडीतुन माचीवर येणारा रस्ता दरवाजातून पुढे गेल्यावर दोन भागात विभातला जातो. उजवीकडे आणि डावीकडे जाणारा रस्ता माचीवरील घोडेवाडीकडे जातो तर सरळ वर जाणारी वाट १५ मिनिटात बालेकिल्ल्याच्या प्रवेशद्वारपाशी येऊन धडकते. दरवाजाची तटबंदी आजही शाबूत आहे. बालेकिल्ल्यावर पोहचल्यावर समोरच एक इमारत आहे. आज ती पूर्णपणे नव्याने बांधून काढलेली आहे. समोरच पाण्याचे टाके व एक विहीर आहे. विहीर बऱ्याच प्रमाणात बुजलेली आहे. किल्ल्यावरून समोरचा परिसर पाहिला की आपल्याला जाणवते की किल्ला किती मोक्याच्या ठिकाणी वसलेला आहे. समोरच दिसणारा सीताबाईचा डोंगर, महादेव डोंगररांग हा परिसर दिसतो. संतोषगडावरून सीताबाईच्या डोंगरातून एक वाट वारुगडावर येते.

गडावर जाण्याच्या वाटा : वारुगडावर जायचे असल्यास फलटण गाठावे. फलटण पासून किल्ल्यावर जाण्यास अनेक मार्ग आहेत. वारुगड मुख्यतः दोन भागात विभागला आहे. एक गडाची माची यावर घोडेवाडी नावाची वस्ती आहे. तर दुसरा वारुगडाचा बालेकिल्ला. बालेकिल्ल्यात जाण्यासाठी माचीतून जावे लागते. माचीत जाण्यासाठी दोन मार्ग आहेत एक गाडीरस्ता आहे जो थेट माचीत जातो तर दुसरा मार्ग म्हणजे पायवाट जी थेट किल्ल्यावर घेऊन जाते.

१. फलटण ते गिरवी : फलटण ते गिरवी अशी एस.टी. सेवा उपलब्ध आहे. गिरवीतून ५ कि.मी. अंतरावर असणारा जाधववाडा गाठावा. जाधववाडा हे किल्ल्याच्या पायथ्याचे गाव आहे. येथून वारूगड माचीवर जाण्यास २ तास लागतात. माचीतून बालेकिल्ल्यावर जाण्यास २० मिनिटे पुरतात.

२. फलटण दहीवडी : फलटण दहीवडी रस्त्यावर फलटण सोडल्यानंतर २० कि.मी. अंतरावर मोंगळ नावाचा फाटा लागतो. या फाट्यापासून एक कच्चा गाडीरस्ता थेट माचीवरील घोडेवाडी वस्तीत घेऊन जातो. मोंगळ ते घोडेवाडी अंतर १५ कि.मी.चे आहे. फलटण दहीवडी रस्त्यावर फलटण सोडल्यानंतर २६ कि.मी. अंतरावर बीजवाडी नावाचे गाव लागते. या गावातून एक कच्चा गाडीरस्ता थेट माचीवरील घोडेवाडीत जातो. पुढे हा रस्ता वर सांगितलेल्या रस्त्याला येऊन मिळतो.

वारुगडाच्या माचीवर असणाऱ्या भैरवगडाच्या मंदिरात १०० लोकांची सोय होते. जेवणाची सोय आपणच करावी. माचीवर बारामही पिण्याचे पाण्याची टाकी आहे. गडावर जाण्यासाठी जाधववाडीतून दोन तास लागतो. गडावर जाण्यासाठी सर्व ऋतुत जाता येते.

#वारुगड #किल्ला #Varugad

संतोषगड किल्ला

संतोषगड किल्ला Santoshgad Fort – २९०० फूट उंचीचा हा किल्ला गिरीदुर्ग प्रकारातील आहे.
सातारा जिल्ह्यातील सातारा -फलटण डोंगररांगेतील हा किल्ला ट्रेकर्स च्या दृष्टीने सोपा समजला जातो.

सह्याद्रीची मुख्य डोंगररांग प्रतापगडापासून तीन भागांमध्ये विभागली गेलेली आहे. शंभूमहादेव रांग, बामणोली रांग आणि म्हसोबा रांग यापैकी म्हसोबा. डोंगररांगेवर संतोषगड, वारुगड, महिमानगड आणि वर्धनगड हे किल्ले आहेत हा सर्व परिसर तसा कमी पावसाचाच मात्र ऊसाच्या शेतीमुळे सर्व परिसर सधन झालेला आहे. सर्व ठिकाणी वीज, दूरध्वनी अशा आधुनिक सुविधा सुद्धा उपलब्ध आहेत. फलटणच्या माण तालुक्यात असणाऱ्या या किल्ल्यांना पाहण्यासाठी दोन दिवस पुरतात. संतोषगडाला ताथवड्याचा किल्ला असे ही म्हणतात.

गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे : आज किल्ल्याचा दरवाजा मात्र केवळ नाममात्रच शिल्लक राहिलेला आहे. दरवाज्यामधील पहारेकऱ्यांचा देवड्या आजही सुस्थितीत आहेत. दरवाज्यातून आत शिरल्यावर समोरच हनुमानाचे टाके आहे. त्याच्याच मागे वाड्यांचे व घरांचे अवशेष आहेत. धान्य कोठारांच्या भिंति उभ्या आहेत पण छप्पर उडालेले आहे. याच्याच मागच्या बाजूला एक मोठा खड्डा आहे. लांबवरून पाहिल्यास एखादी विहीरच वाटते मात्र जवळ गेल्यावर समजते की खाली पाण्याचे टाकं आहे आणि टाक्यात उतरण्यासाठी चक्क कातळभिंतिला भोक पाडून पायऱ्या केलेल्या आहेत. किल्ल्याची पहिल्या टप्प्यावा असणारी संरक्षक तटबंदी, बुरुज आजही चांगल्या परिस्थित उभे आहेत. आजमितिस अनेक किल्ल्यांची तटबंदी ढासळलेल्या आढळतात. पण संतोषगड याला अपवाद आहे. किल्ल्याचा संपूर्ण परिसर भटकण्यास दोन तास पुरतात. किल्ला तसा छोटासाच आहे पण तटबंदी, बरुज असे पाहण्यासारखे बरेच काही आहे. गडावरून फार दूरच्या प्रदेशावर नजर ठेवता येत असे. पश्चिमेस मोळघाट, दक्षिणपूर्व पसरलेली डोंगररांग याच डोंगररांगेवर सीताबाईचा डोंगर व वारूगड आहे.

गडावर जाण्याच्या वाटा : ह्या किल्ल्यावर जाण्यासाठी फलटण आणि सातारा दोन्ही शहरातून जाता येते. ताथवडे किल्ल्याच्या पायथ्याचे गाव आहे. ताथवडेला अनेक मार्गांनी पोहचता येते. फलटण ते ताथवडे अशी एस.टी सेवा दर अर्ध्या तासाला उपलब्ध आहे. फलटण ते ताथवडे हे साधारण १९ कि.मी. चे अंतर आहे. साताऱ्याहून पुसेगाव मोळघाटमार्गे फलटणला जाणाऱ्या बसने ताथवडेला उतरता येते. पुसेगाव ते ताथवडे हे साधारण २३कि.मी. चे अंतर आहे. ताथवडे गावातून किल्ल्यावर जाण्यासाठी व्यवस्थित वाट आहे. या वाटेने किल्ल्यावर जाण्यास अर्धा तास लागतो. ताथवडे गावात ‘बालसिद्धचे जीर्णोद्धार’ केलेले मंदिर आहे. मंदिराच्या पायरीवरून सन १७६२ मध्ये किल्ल्याचा जीर्णोद्धार केल्याचे समजते. गड हा तीन भागात विभागला आहे. पहिल्या टप्प्यावर सरंक्षक तटबंदी तर दुसऱ्या टप्प्यावर माचीचा भाग आणि सर्वात वरचा बालेकिल्ल्याचा भाग आहे. किल्ल्यावर जाण्याच्या वाटेवर एक मठ आहे. या मठाच्याच बाजूला एक गुहा आहे. या गुहेत थंड पाण्याचा साठा आहे. एक वाल्मिकी ऋषिंची मूर्ती आहे. मठाच्याच वरच्या बाजूला एक दरवाजा आहे मात्र येथपर्यंत पोहचण्यासाठी वळसा घालून यावे लागते. मठाच्या डाव्या बाजूला जाणारी वाट तटबंदीला चिटकूनच पुढे जाते. पुढे वाटेतच एक छोटेसे देऊळ लागते. येथून वर थोडी उजवीकडे सरकत जाणारी वाट आपल्याला थेट किल्ल्याच्या दरवाज्यातच घेऊन जाते. गड हा तीन भागात विभागला आहे. पहिल्या टप्प्यावर सरंक्षक तटबंदी तर दुसऱ्या टप्प्यावर माचीचा भाग आणि सर्वात वरचा बालेकिल्ल्याचा भाग आहे. किल्ल्यावर जाण्याच्या वाटेवर एकमठ आहे. या मठाच्याच बाजूला एक गुहा आहे. या गुहेत थंड पाण्याचा साठा आहे. एक वाल्मिकी ऋषिंची मूर्ती आहे. मठाच्याच वरच्या बाजूला एक दरवाजा आहे. मात्र येथपर्यंत पोहचण्यासाठी वळसा घालून यावे लागते. मठाच्या डाव्या बाजूला जाणारी वाट तटबंदीला चिटकूनच पुढे जाते. पुढे वाटेतच एक छोटेसे देऊळ लागते. येथून वर थोडी उजवीकडे सरकत जाणारी वाट आपल्याला थेट किल्ल्याच्या दरवाज्यातच घेऊन जाते.

किल्ल्यावर राहण्याची सोय नाही. जेवणाची सोय आपणच करावी. किल्ल्यावर पिण्याचे पाणी नाही.
गडावर जाण्यासाठी ताथवडे गावातून अर्धा तास लागतो.

#संतोषगड #किल्ला #Santoshgad

रत्नदुर्ग भगवतीचा किल्ला

रत्नदुर्ग भगवतीचा किल्ला Ratnadurg Bhagwaticha Fort – हा किल्ला गिरीदुर्ग प्रकारातील आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील कोकण डोंगररांगेतील हा किल्ला ट्रेकर्स च्या दृष्टीने अत्यंत सोपा समजला जातो.

रत्नागिरी शहरापासून अवघ्या २-३ कि.मी. वर असणारा रत्नदुर्ग हा पर्यटकांसाठी मुख्य आकर्षणाचा विषय ठरला आहे. तो त्यावरील अत्यंत सुंदर भगवती मंदिरामुळे, येथून दिसणाऱ्या समुद्राच्या विहंगम दृश्यामुळे आणि समुद्रापर्यंत जाणाऱ्या किल्ल्यातील भुयारी मार्गामुळे रत्नदुर्ग रत्नागिरी शहराच्या अत्यंत जवळ असून अरबी समुद्राच्या काठावरील डोंगरावर बांधण्यात आला आहे. किल्ल्याचा आकार घोड्याच्या नालासारखा असून क्षेत्रफळ १२० एकर आहे. रत्नदुर्ग तीनही बाजूंनी समुद्राने वेढालेला असून याच्या आग्नेय दिशेला जमीन आहे. किल्ल्याच्या पायथ्याशीच मिरकरवाडा हे बंदर आहे.

इतिहास : रत्नदुर्गाची बांधणी फार पूर्वी बहमनी काळात झाली. १६७० साली शिवाजी महाराजांनी हा किल्ला अदिलशहाकडून जिंकून घेतला. धोंडू भास्कर प्रतिनिधी यांनी १७९० साली किल्ल्याची डागडुजी करून याला अधिक मजबुती आणली.

गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे : किल्ल्याच्या प्रवेशद्वारातून आत शिरल्यावर समोरच सुबक बांधणीचे श्री भगवतीचे शिवकालीन मंदिर आहे. भगवती देवीचे दर्शन घेऊन पुढे गेल्यावर एका ठिकाणी चारही बाजूंनी भिंतींनी संरक्षित केलेली एक जागा आपल्याला दिसते. हाच तो तीन तोंडाचा भुयारी मार्ग. आज हा भुयारी मार्ग वापरात नसला तरी दीपगृहाकडून किल्ल्याच्या प्रवेशद्वाराकडे येतांना लागणाऱ्या तटबंदीवरून या भुयाराचा शेवट खाली समुद्रकिनाऱ्यावर ज्याठिकाणी होतो तेथे असलेली एक प्रचंड गुहा स्पष्ट दिसते. या भिंतीनी संरक्षित केलेल्या तीन तोंडाच्या भुयारी मार्गापासून थोडे पुढे चालत गेले असता समुद्राचे मनोरम दर्शन घडवणारा एक बुरूज लागतो. या बुरुजाचे नाव रेडे बुरूज असून यावर एक स्तंभही उभारला आहे. किल्ल्याच्या एका बाजूला दीपगृह असून या दीपगृहावरून संपुर्ण रत्नागिरी शहराचे तसेच समुद्राचे अत्यंत सुंद्र दृश्य दिसते. किल्ल्यात एक लहान तळे व एक खोल विहीत आहे. रत्नागिरी शहरातून किल्ल्याकडे जाण्यासाठी रिक्षा सोईची असून रत्नागिरी शहराचा नजारा दीपगृहावरून संध्याकाळी ५:०० च्या सुमारास गेल्यास तशी परवानगी मिळू शकते.

गडावर जाण्याच्या वाटा : किल्ल्यावर जाण्यासाठी वरपर्यंत डांबरी रस्ता असून किल्ल्याच्या पायथ्याशीच शंकराचे श्री भागेश्वर मंदिर आहे. या मंदिराच्या खांबांवर पशूपक्ष्यांची सुंदर सुंदर चित्रे कोरलेली असून मंदिराच्या सभोवती नारळी, पोफळी व फुलझाडांनी बहरलेली बाग आहे.

गडावर राहण्याची सोय नाही. जेवणाची सोय नाही. मंदिराजवळ पिण्याचे पाणी मिळू शकते.

#रत्नदुर्ग भगवतीचा #किल्ला #RatnaDurga